पनाखेड येथील आदिवासी शेतकऱ्यांचा रेल्वे प्रकल्पाला विरोध; मोबदला व सरकारी नोकरीची मागणी
शिरपूर तालुक्यातील पनाखेड गावातून जाणाऱ्या मनमाड–धुळे–इंदौर रेल्वेमार्ग प्रकल्पाला आता स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रकल्पासाठी वनजमिनीची मोजणी व मार्किंग करण्यात आली असली तरी बाधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी नोटीस देण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच शिरपूर प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत, रेल्वे प्रकल्पात जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा तसेच प्रत्येक बाधित कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
“ही जमीनच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा आधार आहे. जमीन गेल्यास आमचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येईल,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास जमीन देण्यास नकार देत मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कुटुंबासह तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी मनोज पावरा, प्रवीण पावरा, नारसिंग पावरा, लकी पावरा, अण्णा भील, रमेश भील, सिताराम पावरा, गात्र्या पावरा, भीमसिंग पावरा, भावसिंग पावरा आदी उपस्थित होते.
