🩸 "जन्मदात्याचा खून करणारा मुलगा – बोराडीतील माणुसकीला काळिमा फासणारी घटना!"
पित्याच्या छायेखाली आयुष्य घडवणाऱ्या मुलानेच जन्मदात्याच्या डोक्यात घाव घालून संपूर्ण बोराडी गाव हादरवणारी अमानवी घटना घडवली आहे. शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात घराच्या मालकीवरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, ही घटना मानवी नात्यांतील अधःपतनाचे दुःखद उदाहरण ठरली आहे.
बोराडी येथील सिंगा तुमडू पावरा (वय ७०) हे आपल्या मुलासोबत एकत्र बांधलेल्या घरात राहत होते. मात्र, त्यांचा मुलगा सुनिल सिंगा पावरा (वय ३०) यास त्यांचा तिथे राहणे खटकत होते. या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत वाद सुरू होता.
घटनेच्या दिवशी दि. १ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता, वडील झोपेत असताना सुनिल याने आधी त्यांना शिवीगाळ केली आणि नंतर लाकडी दांडक्याने डोक्यावर घाव घालून गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत त्यांना हिरा मेडिकल कॉलेज, धुळे येथे दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची तक्रार मयताचा दुसरा मुलगा आमावश्या सिंगा पावरा (वय ३५) याने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली असून, आरोपी सुनिल पावरा याच्यावर गुन्हा रजि. नं. १६०/२०२५ नुसार भारतीय दंड विधान कलम १०२(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पवार हे करीत आहेत.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे , उप विभागीय पोलीस अधिकारी शसनिल गोसावी यांचे मर्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,शिरपूर तालुका पोलीस स्ेशन, व शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलींद पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोदप ठाकरे,
रमेश माळी , भुषण चौधरी, संजय चव्हाण .पोना मोहन पाटील. रणजीत वळवी, चालक पोलीस हवालदार अलताफ मिझां यांच्या पथकाने केली आहे.
एक घर, दोन पिढ्या आणि खून — ही घटना केवळ गुन्हेगारी प्रकरण नाही तर आपल्या समाजातील मूल्यांची घसरण दर्शवणारी आहे. जन्मदात्याच्या छायेखाली वाढलेल्या हातांनीच जर त्यांच्या प्राणांवर घाव घालायचा असेल, तर हे आपल्या समाजासाठी आत्मपरीक्षणाचे मोठे कारण आहे.
घराच्या चार भिंतीपेक्षा मोठं असतं माणुसकीचं बांधकाम – पण जेव्हा तेच ढासळतं, तेव्हा नात्यांचा मृत्यू होतो… आणि यात केवळ एक बाप मरत नाही, तर माणूसपणही संपतं. या दुःखद घटनांमुळे बोराडे परिसर मात्र हादरला आहे. माणसाच्या संवेदना या किती बोधट होत आहेत यातून हे अधोरेखित होते.