महाराष्ट्र राज्यात मागील १० दिवसांपासून चालत असलेला सत्ता संघर्ष अखेर संपुष्टात आला आणि फार मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान केले. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाल्यानंतर दोन दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करून झाल्यावर येणाऱ्या पाच जुलैपर्यंत महाराष्ट्रातील नवीन मंत्रिमंडळाच्या विस्तार होईल अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात नेमके कोणते चेहरे असतील व कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल याबाबत आता राजकीय चर्चांना उधाण आले असून विविध अंदाज व कयास लावले जात आहेत.
यात प्रामुख्याने धुळे जिल्ह्यातून दोन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. यात शिंदखेडा दोंडाईचा मतदार संघातील जयकुमार रावल हे यापूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री होते व ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासाह मानले जातात. सध्याच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर निवड झाल्यानंतर जयकुमार रावल यांचे मंत्रीपद निश्चित असल्याचे माहिती सूत्रांकडून व्यक्त होत आहे. यापूर्वी त्यांनी पर्यटन मंत्री म्हणून पदभार सांभाळला असून 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 या कालावधीत ते विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. याशिवाय युथ फोरम संघटना ,पंचायत राज समिती ,अंदाज समिती ,सार्वजनिक उपक्रम समिती व क्रीडा धोरण समिती इत्यादी पदांवर त्यांनी सदस्य म्हणून कामकाज पाहिले आहे. जून 2015 पासून ते रोजगार हमी योजना समितीचे प्रमुख होते.
याशिवाय धुळे जिल्ह्यातून खानदेशातील दिग्गज नेते व विधान परिषदेचे आमदार अमरीश भाई पटेल यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले अमरीश भाई पटेल यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यापूर्वी 2003 ते ऑक्टोबर 2004 या कालावधीत त्यांनी राज्याचे शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण खात्याच्या कारभार पाहिला होता. खानदेशात विकासाचे व्हिजन असणारा व मतदार संघाचे कायापालट करण्याची क्षमता असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
आमदार अमरीश भाई यांच्या राजकीय प्रवास
राजकीय प्रवास :
सन 1990 ते 1995, 1995 ते 1999, 1999 ते 2004, 2004 ते 2009 मध्ये महाराष्ट्र विधान सभेत शिरपूर तालुका मतदारसंघाचे आमदार म्हणून अतिशय यशस्वीपणे कामकाज पाहिले.
तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेवर धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक मतदारसंघातून 2010 ते 2016, 2016 ते 2019, 2020 ते 2022 तसेच जानेवारी 2022 पासून पुन्हा सहा वर्षांसाठी आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले.
भाईंनी जानेवारी 2003 ते ऑक्टोबर 2004 कालावधीत शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री म्हणून त्यांची मोठी उज्ज्वल, यशस्वी कामगिरी ठरली.
