दोडाईचा (अख्तर शाह)
दोडाईचा .कामगार संघटना व व्यवस्थापनाचे कामगारांच्या प्रश्नासंबंधात बदली धोरण व बढती संबंधात द्वितक्षीय वाटाघाटीने मान्य केलेल्या तरतुदीचा स्वतः महवितरण कंपनीच्या व्यवस्थापणाने भंग केल्याने तसेच महापारेषण कंपनीत बदली इच्छुक कर्मचारी यांच्या बदल्या न केल्यामुळे त्याचप्रमाणे महानिर्मिती कंपनीत सुध्दा तसेच धोरण अवलंबिल्यामुळे *महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने* संघटनेने मंगळवार दिनांक १६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २१ तीन दिवस काळ्या फिती लावून काम करत, निदर्शने व द्वारसभेद्वारे निषेध करण्याचे व दि.२२ नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचे ठरवले आहे.मंगळवार दिनांक १६ नोव्हेंबरला मुख्यअभियंता,अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता वितरण/निर्मिती पारेषण कंपन्यांच्या महाराष्ट्रातील कार्यालया समोर दुपारी १.३० वाजता द्वारसभा घेऊन,काळया फिती लावून निषेध करण्यात येणार असून दि.२२ नोव्हेंबर पासून विविध कार्यालय समोर उपोषण सुरू करण्यांत येईल.
मान्य तरतुदीची अंमलबजावणीस नकार
महावितरणच्या व्यवस्थापणाने कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या बदल्या बढती,पती-पत्नी एकत्रीकरण, वैद्यकिय कारण संदर्भात उभयमान्य समजोत्याने प्रशासकिय परिपत्रक ५१४,६०७,१३९,१७२६० नुसार बदली धोरण ठरवून प्रसिद्ध केले.मात्र त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यास व्यवस्थापणाने नकार दिला आहे व फिल्डवर बदल्या करण्यात येवू नये म्हणून सॅप प्रणालीला लॉक लावलेला आहे.त्यामुळे फिल्डवर इच्छुक कामगार यांच्या बदल्या करता येत नाही.या धोरणामुळे प्रचंड असंतोष कामगारामध्ये निर्माण झालेला आहे.
दि.१२ ऑक्टोंबर २०२१ रोजी झालेल्या चर्चेत महावितरण वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरणाचे पैसे,वाटाघाटीत १५ दिवसात देण्याचे मान्य करूनही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही.सन २०१८ ते सन २०२३ या पांच वर्षाचा पगारवाढीच करार होऊन २ वर्षे लोटले मात्र थकबाकीचा तिसरा हफ्ता देण्याबाबत हालचाल नाही,० ते ३० युनीट वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे मीटर वाचन व्यवस्थापनाने कंत्राटावर दिले आहे.मात्र कत्रांटदार ते काम योग्य पध्दतीने करीत नाही म्हणून त्याचे काम दबाब टाकून तांत्रिक कामगारा कडून करून घेण्यात येत आहे.
महावितरणाची वाढलेली वीज बिल थकबाकी वसुल करण्यास्तव जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे १२ ऑक्टोबर २०२१ च्या वाटाघाटीत ठरले होते.त्यानुसार तृतीय / चतुर्थ श्रेणी कर्मचारी,विद्युत सहाय्यक यांनी रू.५००० पर्यंतची थकबाकी वसुल करावी व त्यापुढील थकबाकी वसुली करीता सहाय्यक अभियंते, उप कार्यकारी अभियंते,अतिरिक्त कार्यकारी अभियंते, कार्यकारी अभियंते,अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्यावर जबाबदारी निश्चित करून परिपत्रक काढण्याचे मान्य करूनही निर्देश दिले नाहीत व सर्व जबाबदारी लाईन स्टाफ व जनमित्रावर टाकण्यात आली आहे.विविध विभागांत पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची कार्यवाही ठप्प करण्यात आली आहे.हे सर्व प्रशासनाने मान्य करूनही प्रशासन कार्यवाही करीत नाही म्हणून हे आंदोलन करण्याची नोटीस संघटनेने तिन्ही वीज कंपन्याच्या व्यवस्थापणावर बजावलेली असून ३ दिवस निषेध व २२ नोव्हेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यांत आला आहे.
अशी माहिती एका प्रसिद्ध पत्राद्वारे वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा,कार्यध्यक्ष सी.एन.देशमुख, सरचिटणीस कृष्णा भोयर,अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव,राज्य उपाध्यक्ष,उपसरचिटणीस व संयुक्त सचिव यांनी दिली आहे.
Tags
news
