नीरा भीमा कारखाना 7 लाख मे.टन गाळप करणार - हर्षवर्धन पाटील प्रतिनिधी दत्ता पारेकर



    
प्रतिनिधी दत्ता पारेकर 

        पुणे: नीरा भीमा सहकारी साखर कारखाना आगामी गळीत हंगामामध्ये 7 लाख मे. टन उसाचे गाळप करणार असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक असा चांगला दर  दिला जाईल. नीरा भिमा कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याची स्पष्ट ग्वाही कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.3) दिली.
       शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रामध्ये आज एका दिवसामध्ये 5 ठिकाणी मेळावे उत्साहात संपन्न झाले. पिंपरी बु., बावडा,  सुरवड,  शहाजीनगर, निरवांगी येथे झालेल्या मेळाव्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती दर्शवित उस्फुर्तपणे चांगला प्रतिसाद दिला.
         चालू वर्षी पासून शासनाने त्याच हंगामातील साखर उताऱ्यावर एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालू होणाऱ्या हंगामामध्ये शासनाकडून येणाऱ्या आदेशानुसार नीरा भीमा कारखाना ऊस बिला चा पहिला हप्ता जाहीर करेल, हा हप्ता इतर कारखान्याच्या बरोबरीत अथवा त्याहून अधिकचा असावा, असे नियोजन करण्यात आले आहे. नीरा-भीमा कारखान्यावरती प्रेम करा, कारण संस्था महत्वाच्या आहे. नीरा भीमा कारखान्याने गेली 20 वर्षे या परिसरातील शेतकरी, कर्मचारी व इतर हजारो कुटुंबांना आर्थिक आधार दिला आहे. निरा भिमा  कारखाना हे या परिसरातील सहकाराची मंदिर आहे. कारखान्याने सर्व उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे कारखान्याचा अडचणीचा काळ आता संपत आलेला आहे. परिणामी, नीरा भीमा कारखाना आगामी काळात राज्यातील पहिल्या टॉप टेन मध्ये येईल, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मेळाव्यांमध्ये बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले.
          कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची क्षमता प्रतिदिनी 30000 लि. वरून 105000 लि. करण्यात येणार आहे. त्याकरिता आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळाली असून लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरु होईल. तसेच कारखाना चालू वर्षापासून बायो-सीएनजी गॅस निर्मितीचा देशातील सहकारी तत्त्वावरील पहिला महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु करीत आहे.  अशी माहिती देऊन हर्षवर्धन पाटील यांनी नीरा-भीमा कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. 
       कारखान्याचे चालू वर्षीच्या गळीत हंगामापासून ऊस वाहतुकीचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर चालविण्यात येणार आहेत. साखर उद्योगासाठी हे क्रांतीकारक पाऊल आहे. त्यामुळे इंधन खर्चात 50 टक्के पर्यंत बचत होईल. इथेनॉलचे 1 कोटी 75 लाख लि., सेंद्रिय बॅग 2 लाख निर्मिती, 15 लाख घनमीटर बायोगॅस निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस नीरा भीमा कारखाना देऊन सहकार्य करावे, असे नमूद करीत या मेळाव्यांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केल जात आहे .   
      या मेळाव्यांमध्ये बोलताना कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी साखर आयुक्तालयाच्या परिपत्रकातील यादीत जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एकही कारखाना हा लाल लिस्ट मध्ये नाही, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे  सांगितले. तसेच हर्षवर्धन पाटील यांचे सक्षम नेतृत्व नीरा भीमा कारखान्यास  लाभले आहे, त्यामुळे येणार काळ  कारखान्यासाठी भरभराटीचा असल्याचे नमूद केले.
      या मेळाव्यांना उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जमादार, महादेव घाडगे, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड, शेतकी अधिकारी डी.एम.लिंबोरे तसेच गावोगावचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने