शिरपूर - सुलतानी व आस्मानी संकटांचा सामना करणा-या शेतक-यांवर शनिवारी सकाळी बभळाज परीसरात आभाळ कोसळले.सकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटा सह मेघगर्जनेसह पावसाने थैमान घातले. परिसरात आज सकाळी ०७:०० वाजेच्या सुमारास झालेल्या परतीच्या पावसाने कहर माजवला असून सदर पावसामुळे तोंदे,हीसाळे,तरडी बभळाज,अजनाड बंगला,होळनांथे,भावेर,घोडसगाव भाटपुरे सह परीसरातील शेत शिवारातील कपाशी,केळी, टोमॅटो सह पिकांचे मोठे नुकसान झाले असुन आर्थिक फटका बसला आहे.याची माहीती महसूल व कृषी विभागांना देण्यात आली आहे.बहुतांश भागात शेतात शेतात डोलत असलेल्या पीकांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करुन तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अनेर धरण परिसरात ढगफुटी सदृष परीस्थिती पाऊस झाल्याने प्रमुख पाटचारी वरुन पाणी ओसांडून वाहत असल्याने फुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
जवळपास एक ते दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शेत-शिवारातील पिके जमीनदोस्त झाले असुन मुसळधार पाऊस झाल्याने पहील्यांदाच नदी-नाले पूर्ण क्षमतेने वाहु लागले. गावागातील नदीनाल्यांना प्रथमताच पुर आल्याने पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.नदी नाल्याजवळ राहत असलेल्या वस्तीतील नागरीकांची पुरामुळे तारंबळ उडाली. मुसळधार पावसामुळे होळनांथे येथील खंडेलवाल विद्यालयाच्या पटांगणात पूर्णतः पाणी साचलेले आहे.यामुळे शालेय परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
**होळनांथे ,घोडसगावला वीज कोसळली**
विजेच्या कडाक्यात झालेल्या पावसामुळे घोडसगाव येथे वीज कोसळली असून यात रवींद्र रतन कोळी यांच्या घराच्या दिशेने वीज कोसळून त्यांच्या राहत्या घराच्या गॅलरीला तडा गेला आहे तर होळनांथे येथील श्रीमती भारती अंकुश सूर्यवंशी यांच्या भाटपुरा रस्त्यावरील गट नंबर ७२/१ या शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेले ठेलारी जातीचे गाय व वासरु यांच्यावर वीज कोसळून गाय व वासरु जागीच ठार झाले तर लिंबाचे झाडही जळुन खाक झाले आहे. यावेळी होळनांथे सजाचे तलाठी बी.जे.बोरसे, पोलीस पाटील वासुदेव निकम, नरेंद्र सोनवणे, कोतवाल हिम्मत रणदिवे, गोविंदा पाटील, चिनू चव्हाण, पिंटू कोळी आदींच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
Tags
news
