धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात पारंपरिक उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या उद्योगांना आधुनिकतेची जोड द्यावी. कामगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देत रोजगाराची संधी वाढवून मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी शासकीय यंत्रणांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे निर्देश धुळे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी येथे दिले.
पालक सचिव श्रीमती लवंगारे- वर्मा आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना विषाणूसह विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
श्रीमती लवंगारे- वर्मा म्हणाल्या, मानवी निर्देशकांत धुळे जिल्हा मागे आहे. हा निर्देशांक वाढविण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागाची नेमकी गरज लक्षात घेवून कृती आराखडा तयार करावा. पारंपरिक उद्योग, व्यवसायांना वित्त पुरवठा करीत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच शेतीपूरक उद्योग, व्यवसायांसाठी प्रोत्साहन द्यावे. यातून रोजगाराची शाश्वत संधी निर्माण झाल्यास मजुरांच्या स्थलांतराला निश्चित आळा बसेल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय संवेदनशीलपणे हाताळावा. आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकऱ्याला लाभ मिळवून द्यावा. प्रशासकीय पातळीवरील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम आहे. अशा परिस्थितीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वाढवाव्यात. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करावी. माझी वसुंधरा अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत वृक्षारोपण वाढवावे, अशाही सूचना पालक सचिव श्रीमती लवंगारे- वर्मा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. आता आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चार केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या खरीप हंगामात 52 हजार 752 शेतकऱ्यांना 449 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेख, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड, जिल्हा उपनिबंधक डॉ. शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील आदींनी आपापल्या विभागाचा सविस्तर आढावा सादर केला.
Tags
news
