धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूच्या (COVID19) पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात
कोणत्याही मिरवणुका काढण्यास मुंबई पोलिस कायद्यातील कलमानुसार मनाई करण्यात आली आहे, असे पोलिस
अधीक्षक चिन्मय पंडित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
धुळे जिल्ह्यात 17 ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा होत
आहे. त्यातच 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2020 या कालावधीत शिरपूर, शिंदखेडा येथे बालाजी रथ मिरवणुका
काढण्याची शक्यता आहे. मात्र, देशासह धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे विविध
सण, उत्सव सोशल डिस्टन्सिंग व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे साजरा करावा, असे निर्देश आहेत.
त्यानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी वरील आदेश दिले
आहेत.
त्यानुसार धुळे जिल्ह्यात कोणत्याही मिरवणुका काढण्यास मनाई आहे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या
प्रसंगी व प्रार्थनास्थळाच्या आसपास प्रार्थनेच्या आसपास, प्रार्थनेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावरील किंवा
सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी करण्यास किंवा अडथळा निर्माण करण्यास मनाई
आहे. सर्व रस्त्यांवर, रस्त्यांमध्ये, घाटांत, घाटांवर सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या
उतरण्यांच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये जत्रा, देवालय, मशीद, दर्गा आणि सार्वजनिक किंवा लोकांच्या
जाण्या व येण्याच्या जागांमध्ये गोंधळ व बेशिस्तपणे वर्तन करण्यास सक्त मनाई असेल. कोणत्याही रस्त्यात किंवा
रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक ठिकाणी अनियमित वाद्य वाजविण्यास, गाणे म्हणण्यास, ढोल, ताशे वाजविण्यास,
कर्कश वाद्य वाजविण्यास मनाई राहील. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही
सार्वजनिक उपहाराच्या जागेत ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्यास मनाई करण्यात आली आहे. समाजकंटक व्यक्ती
दुरूपयोग करू शकतील, अशी कोणतीही वस्तू, चिजा, बाळगण्यास मनाई आहे. काही चीज व वस्तू मिळून
आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत, असेही पोलिस अधीक्षक श्री. पंडित
यांनी म्हटले आहे.
