लातुर : दि. २७ - महानगरपालिकेने लातूर शहरातील स्वमालकीच्या असलेल्या सर्वच जागा अतिक्रमण मुक्त करून महानगरपालिकेच्या ताब्यात घ्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी लातुर महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे तसेच लातूरचे जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांच्याकडे केली आहे.
राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयास दिलेली जागा संस्थेने महानगरपालिकेचे लाखो रुपयाचे भाडे न भरल्यामुळे महानगरपालिकेने कार्यवाही करून ती जागा ताब्यात घेतली आहे. महानगरपालिकेने केलेल्या त्या कार्यवाही बद्दल पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी महानगरपालिकेचे अभिनंदनच केले आहे. मात्र एका संस्थेला एक न्याय आणि दुसऱ्या संस्थेच्या ताब्यातील महानगरपालिकेच्या जागा त्यांच्याच ताब्यात ठेवून गुपचूप मलिदा खाय अशी अवस्था निर्माण होऊ नये अशी शंका व्यक्त केली आहे. यशवंत विद्यालयाची जागा ताब्यात घेताना जे धाडस दाखवले तसेच लातूर शहरातील अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा आहेत मात्र काही ठिकाणी संस्थांनी तर काही ठिकाणी वैयक्तिक रित्या या जागांवर अतिक्रमण केलेले आहे तसेच भाड्याने घेऊन सुद्धा महानगरपालिकेचे भाडे थकवलेले आहे. तेव्हा अशा सर्व जागा अतिक्रमणमुक्त करून महानगरपालिकेने स्वतःच्या ताब्यात घ्याव्यात. व अशी कार्यवाही करून निपक्षपातीपणाची कृती करून दाखवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
Tags
news
