*कॅन्सरग्रस्त तुळसाबाईंसाठी समाज धावला मदतीला*
*पत्रकार अनिल राठोड यांची कौतुकास्पद कामगिरी*
उमरखेड : अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या अकोली येथील तुळसाबाई मारोती सोळंके या कॅन्सरग्रस्त महिलेच्या मदतीसाठी अखेर समाज धावून आला आहे. अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणींशी दोन हात करत तुळसाबाईंनी आजारावर मात करण्याचा प्रयत्न केला ; मात्र उपचारांसाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत नसल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.
या पार्श्वभूमीवर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे प्रदेश संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी तुळसाबाईंची परिस्थिती मांडत, “फुल नाही फुलांची पाकळी” या भावनेतून मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले. स्वतःचा संपर्क क्रमांक व स्कॅनर शेअर करत त्यांनी पारदर्शकतेची हमीही दिली. या आवाहनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करत तब्बल २४,२०० रुपये इतकी रक्कम जमा केली. ही मदत तुळसाबाईंसाठी मोठा आधार ठरली असून त्यांच्या उपचारांना नवसंजीवनी मिळाली आहे.
अत्यंत गरीब कुटुंबातील या महिलेच्या मदतीसाठी समाजाने दाखवलेली एकजूट ही मानवतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे. संकटसमयी पुढे सरसावणारा समाजच खरी ताकद असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. समाजातील प्रत्येकाने ‘एक हात मदतीचा’ देत अशा गरजूंसाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
