‘स्पर्धा परीक्षेचा मार्ग सुलभ करणारा प्रकाशस्तंभ!’
शिरपूरमध्ये मोफत MPSC-UPSC मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरपूर (ता. 14 जून):
शहरातील युवक-युवतींच्या स्पर्धा परीक्षा तयारीला नवी दिशा देणारा आणि प्रेरणादायी ठरणारा मोफत मार्गदर्शन शिबिर येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था,शिरपूर यांच्या वतीने राजपूत भवन, वरझडी रोड, दादूसिंग कॉलनी, शिरपूर येथे संपन्न झाला.
या उपक्रमात MPSC व UPSC सारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती, मार्गदर्शन व यशस्वी होण्याचे मार्ग विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
14 जून रोजी सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या या शिबिरात शेकडो विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात दिल्ली येथील सिव्हिल आयएएस चे संस्थापक श्री. अभिनवसिंह राजपूत आणि अहमदाबाद येथील प्रसिद्ध मार्गदर्शक श्री. किरणसिंह सिसोदिया यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवाचे बोल आणि परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या संघर्षकथा विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजल्या.
या मार्गदर्शन शिबिरात MPSC आणि UPSC परीक्षांमधील मूलभूत फरक, पात्रता निकष, तयारीची पद्धत, नियोजन, अभ्यासक्रम, वर्तमान घडामोडींचे महत्त्व, मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, सकारात्मक मानसिकता, आत्मविश्वास व वेळेचे नियोजन यावर मोलाचे मार्गदर्शन देण्यात आले.
श्री. अभिनवसिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, "ध्येयावर ठाम राहा. योग्य मार्गदर्शन आणि न थांबणारी तयारी असल्यास जगात कोणतीही परीक्षा अशक्य नाही."असा विश्वास दिला.
मार्गदर्शकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या शंका सोडवत त्यांना अभ्यासासाठी रणनीती व प्रेरणा दिली.
या शिबिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील करिअरच्या वाटचालीसाठी योग्य दिशा मिळाली आहे. पालकांनीही अशा उपक्रमांमुळे आपल्या मुलांना प्रचंड ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
स्पर्धा परीक्षांचा प्रवास कठीण असला तरी, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे हे ध्येयही सहज गाठता येते, हे या शिबिरातून स्पष्ट झाले.
शिरपूर शहरात अशा प्रकारचे आयोजन करून महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थाने समाजातील युवकांसाठी एक प्रेरणादायी आणि उदात्त कार्य केले आहे. ही सुरुवात एक नवीन स्पर्धात्मक क्रांतीचे दार उघडणारी ठरेल, यात शंका नाही.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना ना फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे समजले, तर योग्य नियोजन, आत्मचिंतन आणि प्रेरणादायी विचारांमुळे हे यश कसे मिळवता येते याचा ठोस आराखडा सुद्धा मिळाला.
मुंबई येथील उद्योजक तसेच थाळनेर येथील युवा उद्योगपती श्री. धनराज राजपूत यांचे या शिबिरात अनमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या या प्रसंगी गटविकास अधिकारी श्री. प्रदीपसिंह पवार, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह राजपूत, उपाध्यक्ष योगेंद्रसिंह सिसोदिया, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र सिंह सिसोदिया, तसेच समाजातील अनेक पदाधिकारी, विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी तर आभार प्रदर्शन योगेंद्रसिंह सिसोदिया यांनी केले.