Breaking News
मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्यानंतर पोलीस अधीक्षकांवर कारवाई
नवीन पोलीस अधीक्षकांची नियुक्ती
जालना - मराठा समाजाच्या रोषानंतर राज्य सरकारने जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवत आता नव्या पोलीस अधिकाऱ्याच्या हाती सूत्रे दिली आहेत.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. सकल मराठा समाजाने विविध जिल्ह्यांत सरकारविरोधात निदर्शने करत आपला रोष व्यक्त केला. तसंच याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांन सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. दोशी यांच्या जागी आता आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे हे आता जालना पोलीस अधीक्षकपदी रुजू झाले असून, त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांसोबत झालेल्या घटनेनंतर जिल्ह्यात आज अत्यंत जलदगतीने घडामोडी घडल्या आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय झाल्यानंतर, त्यांच्या जागेवर तातडीने आयपीएस शैलेश बलकवडे यांना पाठविण्यात आले आहे. ते तात्काळ जालन्यात हजर झाले असून, त्यांनी पदभारही स्वीकारला आहे
शैलेश बलकवडे हे अत्यंत कडक शिस्तीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी गोंदिया, नागपूर ग्रामीण,कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. तसेच, त्यांच्या पत्नी कादंबरी बलकवडे या आयएएस अधिकारी आहेत.
दरम्यान, अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी जालना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये अधिकाराचा वापर करून याद्वारे पाच (५) किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करीत असल्याचे आदेश काढले असून हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी ४ सप्टेंबर रोजी ०६.०० वाजेपासून ते १७ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत लागू राहील असे जाहीर करण्यात आले आहे.
