शिरपूर प्रतिनिधी - 15 जानेवारी हा दिवस आपल्या देशात भारतीय सेना दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या खिशाच्या पाकिटात परिवाराचा फोटो आणि हृदयात भारत माता , आणि याच भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणाची ही परवा न करता देश सेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून शिरपूर शहरातील निमझरी नाका जवळील गुजर हॉल येथे भारतीय सेना दिवस व सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे आयोजन चंदन आबा फाउंडेशन, गंगाई चिल्ड्रेन हॉस्पिटलचे डॉक्टर दिपक विजयसिंग गिरासे व मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
आपण ज्या समाजात जन्माला आलो, आणि ज्या देशाचे आपल्या आयुष्यावर ऋण आहे त्याप्रती कृतज्ञता म्हणून गंगाई चिल्ड्रेन हॉस्पिटल शिरपूर चे संचालक डॉक्टर दिपक विजयसिंग गिरासे हे आपल्या हॉस्पिटलच्या स्थापनेपासूनच तालुक्यातील गोरगरिबांच्या मुलांवर व भारतीय सेनेतील जवानांच्या परिवारातील मुलांवर मोफत उपचार करतात. आणि त्यांच्या संकल्पनेतून माजी सैनिकांचा सन्मान म्हणून भारतीय सेना दिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी शिरपूर तालुका माजी सैनिक व विधवा पत्नी संघ चे माजी सैनिक, सेनेतील कॅप्टन हवालदार सुभेदार इत्यादी महत्त्वपूर्ण पदांवर जबाबदारी निभावणारे
सेनादलातील सैनिक यावेळेस उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीत दिल दिया है जान भी देंगे या अजरामर गीताने किरण पाटील सर व अशोक सोनवणे सर यांच्या मधुर सुराने करण्यात आली.
यानंतर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित माजी सैनिकांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर आलेल्या जवळपास 45 पेक्षा अधिक माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माजी सैनिकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. आणि भारतीय सेना दिनाच्या निमित्ताने आमचा सन्मान केला म्हणून आभार व्यक्त केले. यात एका माजी सैनिकाने, सेनेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तीस वर्षांनी कोणीतरी माझा सन्मान केला ही बाब माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर दिपक विजयसिंग गिरासे यांनी मांडली. जगाच्या पाठीवर फक्त भारत असा देश आहे की जेथे देशाच्या मातृभूमीला मातेचा दर्जा दिला जातो. आणि देश संरक्षणात व देशाच्या प्रगतीत सीमेवरील सेना व शेतात काळ्या मातीतून सोने पिकवणारा शेतकरी यांची मोलाची भूमिका आहे. त्यांच्या प्रति कृतज्ञता व देशभक्ती भाव म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गिरीश गांगुर्डे सर व उपेंद्र पाटील सर
यांनी केले .



