शिरपूर तालुक्यातून रेशन मालाची तस्करी करून तो नजीकच्या मध्य प्रदेश राज्यात विकला जात आहे असा आरोप तालुक्यातील मलकातर येथील नागरिकांनी केला आहे. याबाबत मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर संशयित वाहनांचे व्हिडिओ व बातम्या फिरत आहेत.
आदिवासी गोरगरीब जनतेला रास्त भावात धान्य मिळावे म्हणून शासनाने आणलेल्या विविध योजनांना तिलांजली देत कोणाच्या आशीर्वादाने रेशन तस्करी होत आहे? असा प्रश्न आता तालुक्यातील नागरिकच उपस्थित करत आहेत.
पुरवठा विभागाच्या नवीन नियमानुसार सर्व धान्याचे उचलची नोंद व वाटपाची नोंद ही ऑनलाईन पद्धतीने ठेवली जात असून प्रत्येक लाभार्थ्याला अंगठ्याच्या ठसा दिल्यानंतरच रेशन मालाच्या पुरवठा होतो असे असले तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर रेशन मालाची चोरी कशी होऊ शकते? त्यामुळे रेशनिंगच्या चोरी करण्याच्या हा राजमार्ग नेमका आहे तरी काय याच्या शोध लावणे गरजेचे आहे.
याबाबत वृत्त असे की 02 डिसेंबर रोजी मालकातर ग्रामस्थांनी तालुक्यातून रेशनिंग मालाची तस्करी होत असल्याबाबतची शंका आल्याने तो माल थेट मध्य प्रदेशात जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संशयित ट्रकला अडवले. मात्र वेळेत महसूल व पोलीस प्रशासनाची मदत प्राप्त न झाल्याने ट्रकचालक फरार होण्यात यशस्वी झाला. त्यामुळे नागरिकांनी मागितलेली मदत त्वरित का पुरवण्यात आली नाही? याबाबत आता शंका उपस्थित केले जात आहे. याबाबत महसूल व पोलीस विभागाशी देखील काही लागेबांधे आहेत का याबाबत नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे.
मात्र जर तालुक्यातून सर्रासपणे शासकीय योजनेतून पुरवला जाणारा गहू आणि तांदूळ याची तस्करी होऊन ट्रक भरून माल सप्लाय केला जात असेल तो नागरिकांच्या निदर्शनास येतो मात्र पुरवठा विभागाला याबाबत काही थांगपत्ता नसावा ही मात्र अजब बाब आहे.
विशेष म्हणजे याच परिसरातून मागील चार महिन्यांपासून नियमित सवलतीचे रेशन मिळत नाही याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या मात्र याबाबत तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. याच परिसरातून एक दोन नव्हे तर तीन ट्रक भरून रेशनिंगच्या माल जात असल्याबाबत नागरिकांच्या निदर्शनास आले मात्र प्रशासकीय दिरंगाईच्या फायदा घेत ट्रक चालक पसार झाले. त्यामुळे आता अडवलेल्या ट्रकच्या नंबर वरून याबाबतची अधिकची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून समोर येत आहे. शिवाय ज्या दुकानधारकांच्या बाबतीत तक्रारी प्राप्त आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात यावी.
जर या वाहनांमध्ये कोणताही गैरप्रकार नव्हता किंवा कोणताही चोरीचा माल त्यांच्याकडे नव्हता तर या तीनही वाहनांनी घटनास्थळावरून पळ का काढला? याबाबत शंका उपस्थित होत आहे . नागरिकांच्या म्हणण्यानुसार तो रेशनिंगचा माल होता असे याच्यातून प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
त्यामुळे घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेत मालकातर ग्रामस्थांनी संशयास्पद रित्या पकडलेला ट्रक क्रमांक एम एच 18 bz 56 13 हा ट्रक कोणाचा आहे? त्यात काय माल भरला होता ? तो कुठून कुठे निघाला होता ?त्या मालाची रीतसर कागदपत्र कायदेशीर आहेत का? घटनास्थळावरून पळून जाण्याचे कारण काय? त्यामुळे संशयित ट्रक मधील माल कोठे जमा झाला व ती गाडी कोणाच्या दारा त उभी राहते इत्यादी बाबत आता पोलिसांनी आणि महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवून चौकशी करावी अशी मागणी मलकातर ग्रामस्थांकडून पुढे येत आहे.
