शिरपूर: तालुका पाणी पॅटर्न नावाने प्रसिद्ध आहे. शिरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी वाहून जाणारे पाणी बंधारा बांधून अडविलेले आहेत. तालुक्यातील जोयदा येथील नागरिकांनी श्रमदानातून गावातून वाहणाऱ्या अरूणावती नदीवरील बंधारा अडवून पाण्याचा उपयोग नागरिक विविध प्रकारच्या कामांसाठी करून घेत आहेत. मागील 30 वर्षात दुसऱ्यांदा पाणी अडवले गेल्याने नागरिक आनंदात आहे.
जोयदा हे गाव पेसा क्षेत्रातील असून अरुणावती नदीच्या काठावर वसलेले आहे. नदीवर 30 वर्षापूर्वी के. टी. वेअर पद्धतिचा बंधारा बांधला गेला. ज. तो जुना असून मजबूत स्थितित आहे. दरवर्षी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. आणि नोव्हेंबर महीन्यातच नदीला डबक्याचे स्वरूप येते. मात्र यावर्षी गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वाहून जाणारे पाणी अडविण्याचे ठरविले. पावसाळा संपला की नदी कोरडी पडून जायची, पण गावकऱ्यांनी श्रमदानातून बंधाऱ्याचे सर्वच्या सर्व 22 दरवाजे बंद केले. आणि बघता बघता पाच ते सहा दिवसांत बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला. गावकऱ्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनाही होत आहे. सदर कामासाठी गावातील सरपंच, पोलीस पाटील, नागरिकांसह तरूणांनी विशेष परिश्रम घेतले.
