शिरपूर - वृत्तपत्रात प्रसिद्धीस आलेल्या जाहीर नोटीसनुसार दि. १०.०९.२०२२ रोजी विशेष सर्व साधारण सभा शि.सा.का. ने आयोजित केलेली आहे. सदर सभेत शि.सा.का. भाडे तत्वावर देणे कामी विषय घेण्यात आलेला आहे. सदर सभेत होणाऱ्या विषयांवर चर्चा करणे कामी शेतकरी विकास फाउंडेशन शिरपुर व विविध शेतकरी संघटना च्या वतीने सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांची संयुक्तिक बैठक दि. ०७.०९.२०२२ रोजी दादुसिंग कॉलोनी, शिरपूर येथे घेण्यात आली.
या बैठकीत शि.सा.का. च्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. विविध शेतकरी संघटना व सभासदांनी कारखाना सुरु होणेसाठी गेल्या ६ वर्षापासून अनेक आंदोलने, उपोषणे, मोर्चे, निवेदने इ. माध्यमातून प्रयत्न केलेले आहेत. त्यात प्रामुख्याने सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत मा. साखर आयुक्त, शि.सा.का. चे पदाधिकारी, जिल्हा बँक धुळे चे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शि.सा.का. भाडे तत्वावर देण्याचा निर्णय देण्यात आला आहे.
संचालक मंडळाने त्यांच्या कार्यकाळात कारखाना सुरु करणेकामी कोणतीही पावले उचललेली नाहीत. परंतु कार्यकाळ संपल्यानंतर का असेना अध्यक्षांनी सभासदांची मीटिंग बोलावली त्याबद्दल संचालक मंडळाचे या संयुक्तिक बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले तसेच शि.सा.का. सुरु करणे कामी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या वेळी शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, विशेष सर्वसाधारण सभा आयोजित होणे हि सर्व शेतकरी संघटना, आंदोलनकर्ते व सभासद यांचे यश आहे. तसेच सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांनी या सभेस मोठ्या संख्येने हजर राहून कारखाना भाडे तत्वावर देण्याच्या निर्णयास पाठींबा देण्याचे आवाहन केले. तसेच दि. १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेच्या पारदर्शकतेसाठी ऑडीयो, व्हिडिओ चित्रीकरण करण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी अॅड. गोपालसिंग राजपूत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शि.सा.का. ऊस उत्पादक शेतकरी व त्यावर अवलंबून असलेल्या घटकांच्या दृष्टीने त्वरित सुरु होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आवश्यक त्या कायदेशीर बाबी तपासून संचालक मंडळाने योग्य तो पाठपुरवा करावा व गाळप हंगाम सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
श्री. कल्पेशसिंह राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सांगितले की, शि.सा.का. सुरु होणे कामी संचालक मंडळास पूर्ण सहकार्य करू आणि गाळप हंगाम सुरु होई पर्यंत लढा सुरु ठेऊ.
श्री. दिनेश मोरे यांनी आपल्या मनोगत सांगितले की, शि.सा.का. भाडे तत्वावर देऊन सुरु करणे हा निर्णय स्वागतार्ह आहे. व त्या कामी सर्वानी आपली सहमती नोंदवावी.
श्री. मोहन पाटील यांनी सभेची सांगता करत असतांना सांगितले की सदर होणारी सभा हि फक्त राजकीय फायद्यासाठी न राहता शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी उपयोगात यावी असे मत व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.
या बैठकीला डॉ. जितेंद्र ठाकूर, मोहन पाटील, ॲड. गोपाल राजपूत, शिरीष पाटील, दिनेश मोरे, मनोहरबापू पाटील, कल्पेशसिंह राजपूत, डॉ. सरोज पाटील, शांतीलाल पाटील, ॲड. संतोष पाटील, जयवंत पाटील, बापु राजपुत, संजय पाटील, शिवाजीराव बोरसे, प्रकाश जमादार, मयूर राजपूत, आशिष अहिरे, हिम्मत राजपूत, प्रशांत पाटील, गौतम अहिरे यांसह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.