शिरपूर( प्रतिनिधी):-धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी फोफावली असून शिरपूर तालुक्यात त्याचे प्रमाण अधिक आहे . या अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी तक्रार होताच तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिस अधीक्षकांनी यात लक्ष घालून जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाणे प्रभारींना अवैध सावकारीची तक्रार आल्यास त्वरीत कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. तसेच झालेल्या कारवाईची माहिती धुळे जिल्हा जागृती मंच, भूमाता ब्रिगेड, भारतीय पत्रकार संघाला मिळावी , अशा मागणीचे निवेदन काल जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले . या निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यात व शिरपूर तालुक्यात अनेक कुटूंबे सावकारी अडकली आहेत . चांगल्या घरच्या व प्रतिष्ठीत कुटुंबातील मुलांना हेरुन त्यांना व्याजाने पैसे देतात . नंतर पठाणी पध्दतीने वसूली करुन त्यांना जेरीत आणतात, प्रसंगी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देतात . वसूलीसाठी दुकानावर , घरी, नोकरीच्या ठिकाणी जावून दमदाटी केली जाते . प्रसंगी त्या व्यक्तिचे वाहनही हिसकावून घेतले जाते . त्यामुळे अनेक कुटूंबे उद्वस्त होत आहेत . हा त्रास सहन न होणाऱ्या अनेकांनी मृत्यूला कवटाळले आहे . शिरपूर तालुक्यात तर सावळदे येथील तापी पुलावरून उडी घेवून आत्महत्या करणाऱ्यांची प्रमाण खूपच वाढले आहे . कोरोना काळात हा प्रकार सर्वाधिक वाढला असून याची सखोल चौकशी झाल्यास अवैध सावकारीचे कारण स्पष्टपणे समोर येऊ शकते .अवैध सावकारी विरुध्द पोलिसांत तक्रार केल्यास न्याय मिळण्याऐवजी त्रास वाढण्याचीच भिती वाटत असल्याने जिल्हा पोलिस प्रमुख या नात्याने आपण जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारींना अवैध सावकारीची तक्रार आल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत , अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे . जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देताना धुळे जिल्हा जागृती मंच संस्थापक अध्यक्षा डॉ.सरोजताई पाटील, भारतीय पत्रकार संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष जीवनभाऊ शेंडगे , भारतीय पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष गोपाल मारवाडी , शेतकरी व कामगार नेता मोहन साहेबराव पाटील,ॲड. गोपालसिंह राजपूत आणि भारतीय Gपत्रकार संघ धुळे शहर उपाध्यक्ष विरेंद्र मोरे, भूमाता ब्रिगेड़ शिरपुर चे अध्यक्ष राजेश मारवाडी इ. उपस्थित होते .
Tags
news
