धुळे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत ‘हर घर- नल से जल’ पाणीपुरवठा होण्यासाठी जलजीवन मिशन लागू करण्यात आले आहे. या मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा खासदार डॉ. हीनाताई गावित यांनी आज आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. येवले यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
खासदार डॉ. गावित यांनी सांगितले, केंद्र शासनाने ग्रामीण भागातील कुटुंबांना सन 2024 पर्यंत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत दरडोई दररोज 55 लिटर पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वाड्या- वस्यांवरील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी गावनिहाय तयार केलेल्या अंदाजपत्रकांना ग्रामसभांची मंजुरी घ्यावी.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, जिल्ह्यात जलजीवन मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा नियमितपणे आढावा घेण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की ग्राम पंचायत निहाय प्रकल्प अहवाल येत्या 26 जानेवारी च्या ग्राम सभेत ठेऊन मंजुरी घेण्यात येईल. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. येवले यांनी जलजीवन मिशन अंतर्गत धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
Tags
news
