शिरपूर : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ येथील आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन दिले.
राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्णत: स्थगित झाले आहे. गेल्या सहा महिन्यात सात जिल्हा परिषद आणि 106 नगर पंचायतीच्या निवडणुका ओबीसींच्या प्रतिनिधित्वाशिवाय पार पडल्या. 52 टक्क्यांवर असलेल्या ओबीसींवर अन्याय सुरु असतांनाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींवर ब्राम्हण्यवादाचा पगडा आहे, त्यांना संघर्षाचा कोणताच इतिहास नाही, माझा ओबीसींवर विश्वास नाही अशी आक्षेपार्ह विधाने केली आहेत. एकीकडे आरक्षण घालवायचे आणि त्याचवेळी ओबीसींना डिवचायचे असा प्रकार सुरु आहे. या वक्तव्याबद्दल मंत्री आव्हाड यांनी जाहीर माफी मागावी व मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष भूपेश परदेशी, श्यामकांत ईशी, राज सिसोदिया, महेश चौधरी, दिनेश पाटील, राजू पाटील, पितांबर पाटील, मनोज पाटील, निखिल पाटील, पलाश पाटील आदिंनी निवेदनातून केली.
Tags
news
