शिरपूर : (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील आढे येथील गावकऱ्यांना शासनाने पुनवर्सनासाठी काही वर्षापूर्वी जागा उपलब्ध करुन दिलेली असून अर्धे गाव पुनवर्सन झाले असून अर्धे गावासाठी शासनाने अद्यापपर्यंत जागा उपलब्ध करुन दिली नसून शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर आदींसाठी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध करून द्यावे व पूर्ण गाव शंभर टक्के पुनवर्सन झाले पाहिजे यासाठी राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते ना.देवेंद्र फडणवीस यांना गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिरपूर दौऱ्यावर विधानसभा विरोधीपक्ष नेते ना.देवेंद्र फडणवीस आले असता त्यांना माजी मंत्री आ.अमरीशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ.काशिराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच मनोहर पारधी, उपसरपंच सुनिल शिरसाठ, ग्रा.पं.सदस्य सुनिल पवार, अॅड.निलेश चव्हाण, शांतीलाल जमादार, सौरभ राजपूत आदींनी निवेदन दिले. ना.फडणवीस यांनी यावेळी राज्यशासनाकडे याविषयी योग्य तो पाठपुरावा करू असे आश्वासन गावकऱ्यांना दिले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, धुळे भाजपा मा.जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुका भाजपा चिटणीस सुनिल चौधरी आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, आमचे गाव हे पुनर्वसन गाव असून, शासनाकडून आमच्या गावाला पुनर्वसन जागा देण्यात आली होती. सदर जागेवर आता ज्या नागरिकांचे प्लॉट देण्यात आले आहे ते नागरिक रहिवासासाठी हळूहळू येत आहेत. परंतु शासनाकडून देण्यात आलेली जागा म्हणजेच प्लॉट आमच्या नागरिकांना अपूर्ण असून जवळ-जवळ ३०० लोकांना अद्यापपर्यंत शासनाकडून जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर नागरिकांना अजूनही जुन्या गावात राहावे लागत आहे. एवढेच नव्हे तर आमच्या ग्रामपंचायती अंतर्गत येणारे विविध योजना राबवण्यासाठी देखील आम्हाला जागा नाही, तसेच आता देखील आमच्या गावाला जिल्हा परिषद शाळा ही जुन्या गावाला असून, ती नव्या गावात आणणे अत्यंत आवश्यक असल्याने त्या शाळेला देखील ग्रामपंचायतीच्या हद्दीत जागा नसल्याने तिचे बांधकाम देखील करता येत नाही. यासंबंधी आम्ही वेळोवेळी तहसीलदार जिल्हाधिकारी तसेच शासन स्तरावरील विविध अधिकाऱ्यांना निवेदन तक्रारी देऊन देखील त्यांनी काही एक दखल घेतलेली नाही म्हणून नागरिकांना रहिवाशांसाठी जागा असो वा शाळा असो तसेच काही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या योजना असो याबाबत आम्हाला शासनाकडून जागा उपलब्ध करण्यात यावी त्याकरिता आपण शासनस्थरावर योग्य तो पाठपुरावा करुन आम्हास न्याय मिळवून द्यावा अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
