शिरपूर : पंतप्रधान फळपिक विमा योजना अंतर्गत हवामान ट्रीगर व्यवस्थित कार्यान्वित आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून ऑडीट करण्यात यावी अशी मागणी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा व भाजपा पदाधिकारी यांनी कृषिमंत्री ना. दादाजी भुसे व जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षी ट्रीगर मुद्द्याबाबत व अनेक पिकांबाबत असंख्य शेतकरी बांधव यांना आर्थिक लाभ मिळाला होता.
यावर्षी देखील शेतकरी हिताच्या दृष्टीने लक्ष देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत सन २०२०-२१ या वर्षासाठी शेतकऱ्यांनी फळपीक विमा भरलेला आहे. शिरपूर तालुक्यात होळनांथे, थाळनेर, शिरपूर, सांगवी, अर्थे, बोराडी व जवखेडा असे एकूण सात ठिकाणी मंडळांवर हवामान केंद्रे आहेत. गेल्या वर्षी पावसामुळे तसेच मोठ्या प्रमाणात वारे वाहिल्याने ट्रिगर कार्यान्वित आहे किंवा नाही याची तपासणी होऊन ऑडिट व्हावे. तपासणीचे ऑडिट करताना आमदार काशीराम पावरा यांनी सुचविलेले शेतकरी, महावेध कंपनीचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी यांच्या समक्ष तपासणी व ऑडिट करण्यात यावे. तसेच सदर अहवाल आमदार काशीराम पावरा यांच्याकडे सादर व्हावा याबाबत संबंधित अधिकारी यांना कृषीमंत्री दादाजी भुसे व जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सूचना द्याव्या अशा आशयाचे पत्र आमदार काशीराम पावरा यांनी दिले आहे.
शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन प्रकाश भोमा गुजर, ऍड. बाबा पाटील, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक भरत पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, मांडळचे माजी सरपंच भटू माळी, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, भाजपचे अनेक पदाधिकारी, अनेक शेतकरी यांनी ही मागणी केली आहे.
