शिरपूर - माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सुमारे १०२५ शेतकरी बांधव यांना प्रत्येकी प्रति हेक्टर ३३,००० रुपये याप्रमाणे एकूण ३.३८ कोटी रुपयांचा केळी फळपिक विमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा देखील झाली आहे. याबद्दल शेतकरी बांधव यांनी समाधान व्यक्त केले आहे.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी सातत्याने पाठपुरावा करून पंतप्रधान विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा मिळवून देण्यासाठी तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. यासाठी शासन दरबारी सतत निवेदने देऊन व पाठपुरावा करण्यासाठी तालुक्यातील अनेक पदाधिकारी, शेतकरी सोबत होते.
सातत्याने शासनाकडे, कृषी आयुक्त यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने रडार दुरुस्ती करण्यात आली. तसेच अपात्र ट्रीगर हे योग्य प्रकारे लक्ष घालून त्यात सुधारणा होऊन प्रत्यक्षात सापेक्ष नोंदी घेण्यात आल्याने ऊन, वारा, पाऊस आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ सदर ट्रीगर पात्र झाल्याने शेतकऱ्यांना मिळाला. या व्यतिरिक्त अवकाळी पाऊस, गारपीट मुळे इतर अनेक पिकांचे नुकसान झाले होते, त्या सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधव यांनाही नुकसान भरपाई मिळावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी केळी, डाळींब, पेरू, पपई इत्यादी अनेक फळपिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. सदर शेतकऱ्यांनी पंतप्रधान विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा उतरविला आहे. फळपिक, इतर पिक व मालमत्ता विमा धारकांचे वादळामुळे झालेल्या नुकसानीचे सामूहिक पंचनामे करून नुकसान भरपाई विमा दावा मिळावे यासाठी आ. काशिराम पावरा यांच्यासह असंख्य पदाधिकारी यांनी निवेदन दिले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामुळे हजारो शेतकरी बांधवांनी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा व सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
शेतकरी बांधव यांच्या खात्यावर विमा कंपनी तर्फे विमा रक्कम ३ कोटी ३८ लाख २५ हजार रुपये जमा झाल्याचे तालुका कृषी अधिकारी शिरपूर व विमा कंपनी अधिकारी यांनी सांगितले. तसेच अजूनही लाभार्थी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
Tags
news

