लेख - १५ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन* ✍️पत्रकार रणवीरसिंह राजपूत*

 



*लेख - १५ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन*  

✍️पत्रकार रणवीरसिंह राजपूत*

 

        *विजयी विश्व तिरंगा प्यारा*.. 

*झंडा ऊंचा रहे हमारा*..


मित्रहो,*स्वातंत्र्य दिन* हा खऱ्या अर्थानं आनंदोत्सव असतो.एक एक प्रगतीचे पाऊल पुढे टाकत आपण सर्वांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा अर्थातच भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७८ वर्षे पूर्ण होताहेत अन् स्वातंत्र्याचा ७९ वां वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत,ही भारतीय जनमानसाला सुखद दिलासा देणारी गोष्ट आहे.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट संपुष्टात आली.पारतंत्र्याचा काळोख नाहिसा होऊन,भारत मातेच्या उदरातून स्वराज्याचा उष:काल उदयास आला.खरं तर,स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शेकडो क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं.त्यांच्या गोड स्मृती आमच्या हृदयात चिरकाल तेवत राहतीलच,हे सूर्य किरणाएवढं शुभ्र सत्य आहे.


दरम्यान गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात सर्वधर्मियांना सामावून घेऊन खिलाफत चळवळ,असहकार चळवळ,मिठाचा सत्याग्रह, करेंगे या मरेंगे,भारत छोडो ही जनआंदोलने छेडण्यात आली.त्यातूनच पुढे *१५ ऑगस्ट* हा सुवर्ण दिवस प्रकाशमान झाला.त्यामुळे आज प्रत्येक भारतीय स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहे,ही क्रांतिकारकांची पुण्याईच म्हणावी!आज आपण सर्वजण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत,हे वास्तवात क्रांतिकारकांच्या त्यागाचं फलित आहे,ही गोष्ट प्रत्येक भारतीयाने आपल्या हृदयात कोरून ठेवावी.वास्तविक पहाता,स्वातंत्र्य दिन साजरा करणं म्हणजे ज्या शुरवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक केला,त्यांची आठवण करत त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांचे गोडवे गाण्यासाठी तथा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देश्याने १५ ऑगस्ट हा दिवस सर्वधर्मीय नागरिक दरवर्षी साजरा करीत असतात.चला तर,आपण सर्वजण एकसुराने बोलूया *जय हिंद,जय हिंद,जय हिंद...* 


भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करताना आपल्या भाषणातून सकल भारतीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांनीही नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या *हर घर तिरंगा* अभियान देशभर राबविण्यात आला आहे.

 या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे देशाप्रती राष्ट्रप्रेम,देशाभिमान,

सार्वभौमत्व,एकात्मता, अखंडता,राष्ट्रीय तिरंगा झेंड्याचे पावित्र्य अन् महत्व हे सर्व भारतीयांच्या मनात खोलवर रुजविणे होय.


*या धर्तीवरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घरो घरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून सर्वधर्मीय नागरिकांनी/विद्यार्थ्यांनी आपापल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवावा अन् ध्वजा सोबतचा सेल्फी harghartiranga.com या वेबसाईटवर अपलोड करून या अभियानात मोठ्या संख्येनं सामील व्हावं,असं आवाहन केलं आहे*.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कस्तुरबा गांधी,मादाम कामा, मोतीलाल नेहरू,डॉ.राजेंद्र प्रसाद, विजयालक्ष्मी पंडित,गोपाळ कृष्ण गोखले,जवाहरलाल नेहरू, कमला नेहरू,इंदिरा गांधी,

लालबहादूर शास्त्री,सरोजनी नायडू,साने गुरुजी,वल्लभभाई पटेल,जयप्रकाश नारायण,विनोबा भावे, अरूणा 

आसफअली,यशवंतराव चव्हाण,बाबू गेनू,ठाण्याचे दत्ताजी ताम्हणे,नंदुरबारचे बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता,पश्चिम खान्देशचे दादासाहेब रावल,दादुसिंग राजपूत,धनाजी नाना चौधरी,त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई चौधरी आदी असंख्य स्वातंत्र्यसेनानींनी अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देऊन ब्रिटिशांना *भारत छोडो* हा निर्वाणीचा इशारा दिला.


तर दुसऱ्या बाजूने गोळीला गोळीने उत्तर देणाऱ्या जहालमतवादी क्रांतीवीर लोकमान्य टिळक,क्रांतिकारक 

भगतसिंग,सुखदेव,राजगुरू,

चंद्रशेखर आझाद,सुभाषचंद्र बोस,बटूकेश्वर दत्त,लाला लजपतराय,वासुदेव बळवंत फडके,स्वातंत्र्यवीर सावरकर,क्रांतिवीर नाना पाटील,सेनापती बापट, बिरसा मुंडा,मदनलाल धिंग्रा,चाफेकर बंधू,अनंत कान्हेरे,उमाजी नाईक,ठाणे येथील कोळी समाजाचे मारुतीराव ठाणेकर आदी जहाल क्रांतीकारकांनी फिरंग्यांना जेरीस आणले.सरतेशेवटी इंग्रजांना भारत सोडून जावे लागले.या लढ्यात काहींना वीरमरण आलं,तर काहींनी स्वातंत्र्यासाठी मोलाचं योगदान दिलं.अशाप्रकारे सामूहिक प्रयत्नांतून भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. अशा महान क्रांतिकारकांना आम्हा मराठी भूमिपुत्रांकडून त्रिवार मानाचा मुजरा


आता *स्वराज्य* मिळालं,त्याचं *सुराज्य* करण्यासाठी पंतप्रधान  मा.श्री.*नरेंद्रजी मोदी* यांच्या नेतृत्वाखालील *एनडीए सरकार* ने कंबर कसली आहे.सन्माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देशातील सर्वधर्मीय गोरगरीब,निर्धन,निराधार,

आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक,अल्पभूधारक शेतकरी,शेतमजूर,कामगार  यांचे आवास,शिक्षण,रोजगार,

आरोग्य हे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ठोस योजना राबविल्या जात आहेत.

संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन,त्यांना  कर्ज माफ करणं,कृषीपंपाचे वीज बिल माफ करणे अन् कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 

जलदगतीने पावलं उचलली जात आहेत.त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळत आहे.


मोदीजींच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.याशिवाय प्रधानमंत्री मातृवंदना योजना,प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना,प्रधानमंत्री उज्वला योजना,प्रधानमंत्री किसान मानधन योजना,प्रधानमंत्री ग्राम सिंचाई योजना,दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना,दीनदयाळ अंत्योदय योजना,आदर्श सांसद ग्राम योजना,मेक इन इंडिया,स्टार्ट अप,स्टँड अप इंडिया,जनधन योजना,स्वच्छ भारत योजना,स्मार्ट सिटी योजना,इज ऑफ डूइंग 

बिझनेस अशा विविध लोकोपयोगी योजना *सामान्य माणूस हा केंद्र बिंदू मानून* आतापर्यंत राबविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीयांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मोदीजींना पुनश्च पहिली पसंदी दर्शवून तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान दिला.हीच त्यांच्या कार्यकर्तुत्वाची खरी पावती आहे.


भारताची अंतराळातील शक्ती वाढविण्याच्या उद्देशाने *चांद्रयान-२* ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम 

मोदीसाहेबांनी यशस्वी करून दाखविली.त्यामुळे अशी व्यापक क्षमता असलेला भारत हा जगातील चौथ्या देश गणला गेला आहे.शेकडो वर्षांपासून मुस्लिम महिला ह्या *तिहेरी तलाक* या जाचक कुप्रथेमुळे दुर्लक्षित-उपेक्षित जीवन जगत होत्या.त्यांच्या संरक्षणार्थ मोदींनी पार्लमेंटच्या माध्यमातून *तिहेरी तलाक बंदी कायदा* देशात लागू केला.यास्तव मुस्लिम महिलांनी तथा तिहेरी 

तलाकपिडीत महिलांनी मोदींचे शतश:आभार मानले आहे.जम्मू-काश्मीरसंबंधीचे राज्यघटनेतील *३७० कलम* रद्दबातल करून त्याचा स्वतंत्र दर्जा काढून घेतल्याने,आता तेथे भारतातील कुठलीही व्यक्ती वा कंपनी उद्योगधंदा करू शकते.मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू काश्मीरचा औद्योगिक विकासाला चालना मिळत असून,तेथील बेरोजगार तरुणांच्या हातांना काम मिळू लागलं आहे.त्याची परिणती म्हणजे या राज्याच्या आर्थिक,औद्योगिक व पर्यटन विकासाला गती प्राप्त होऊन राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे.याशिवाय *३५ अ कलम* रद्द करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगवेगळे दोन केंद्रशासित प्रदेश नावरूपाला आले आहेत.याचे श्रेय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री मा.अमितजी शहा यांच्या मुसद्देगिरीला जातं.पहलगाम तथा पाकिस्तान क्षेत्रात ऑपरेशन सिन्दुर व ऑपरेशन महादेव ह्या लष्करी कारवाया करून आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त करून आमच्या निरपराध नागरिकांचा जीव घेणाऱ्या आतंकवाद्यांचा खात्मा केला,वास्तवात ही भारतीय सैनिकांच्या शौर्याची नांदी असून आझाद हिंदुस्थानाची ताकद आहे.


उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मोदीजींच्या प्रभावशाली व पारदर्शक राज्यकारभारामुळे जगातील महासत्तादेखील भारताशी द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्यात उत्सुक होताहेत.त्याची परिणती म्हणजे परकीय गुंतवणुकीत वेगाने वृद्धी होत आहे.अणू चाचण्या,राष्ट्रीय महामार्गांची व्याप्ती वाढविणे,रेल्वे 

सोयी-सुविधांचे बळकटीकरण,स्वदेशी बनावटीची संरक्षण सामग्रीच्या निर्मितीला प्राधान्य,डिजिटल कनेक्टिव्हिटी,डिजिटल 

ट्रान्सफॉर्ममेशन या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.अर्थातच विज्ञान, तंत्रज्ञान,शिक्षण,उद्योग,दळणवळण,स्वदेशी युद्धसामग्री निर्मिती,अंतराळ,कृषी विकास यावर विशेष भर देऊन *सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास* या ब्रीदनुसार देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आणत, मोदीजींनी भारताला विकसित देशांच्या पंगतीत आणून बसविलं आहे,याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे.न भूतो न भविष्यती असा सर्वांगिण विकास करून मोदीजींनी देशाचा कायापालट करून दाखविला.भारताला वैश्विक स्तरावर १० स्थानावरून ५ स्थानावर आणले,ही मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी आहे.त्यामुळेच त्यांना *वैश्विक गुरू* म्हणून मानाचं पान मिळालं,हे समस्त भारतीयांसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे.  


क्रांतिकारकांच्या बलिदानानं मिळविलेल्या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करण्यात मोदीजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने दमदार आगेकूच केली आहे.यासाठी त्यांचे मनस्वी अभिनंदन अन् पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! समस्त भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो!वंदे मातरम्!भारत माता की जय!जय हिंद!जय महाराष्ट्र!




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने