'दिवेर' चे युद्ध म्हणजे महाराणा प्रतापसिंहांचा मुघल साम्राज्यवादावरचा पहिला सर्जिकल स्ट्राईक !
---बळसाणे येथे इतिहासकार जयपालसिंह गिरासे यांचे प्रतिपादन
'हळदी घाटीचे युद्ध म्हणजे मुघल साम्राज्यवादाविरोधात पुकारलेला प्रखर एल्गार होता तर दिवेरचे युद्ध हा मुघलांच्या साम्राज्यवादी सत्तेवर महाराणा प्रतापसिंहांचा पहिला सर्जिकल स्ट्राईकच होता' असे प्रतिपादन महाराणा प्रतापसिंह ग्रंथाचे लेखक व इतिहासकार श्री जयपालसिंह गिरासे यांनी बळसाणे ता-साक्री येथे महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सवानिमित्त आयोजित जाहीर व्याख्यानात बोलतांना केले. श्री जयपालसिंह यांची विविध ऐतिहासिक विषयांवर देशातील आठ राज्यात आठशे पेक्षा जास्त व्याख्याने झालेली असून एकूण आठ ग्रंथांचे त्यांनी लेखन केलेले आहे.
आपल्या ओघवत्या शैलीत सुमारे दीड तास चाललेल्या या व्याख्यानात श्री गिरासे यांनी मेवाड-मुघल संघर्षाची विस्तृत कारणमीमांसा सांगून महाराणा प्रतापसिंहांच्या संघर्षगाथेवर विविध उदाहरणांसह प्रकाश टाकला. बलाढ्य अशा साम्राज्यवादी मुघल सत्तेद्वारे भारतीयांचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व हिरावून घेतले जात असतांना महाराणा प्रतापसिंहांनी पर्वतीय क्षेत्राला आपले केंद्र बनवून सर्वसामान्य जनतेचे सैन्य संघटन उभारले. राजासोबत प्रजा देखील या साम्राज्यवादी शक्तीच्या विरोधात उतरली होती. सुमारे पंचवीस वर्षांपर्यंत महाराणा प्रतापसिंहांनी मुघलांशी प्रखर लढा दिला व आपले स्वातंत्र्य, स्वाभिमान व सार्वभौमत्व अबाधित राखले. आपल्या व्याख्यानात त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
व्याख्यानाच्या आरंभी बळसाणे गावातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री नारायण बाजीराव पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री रावसाहेब पहेलवान, श्री हर्षवर्धन दहिते , श्री उत्पल नांद्रे, श्री प्रदीप नाना नांद्रे, श्री रमेशभाऊ सरक , शहादा कृउबा चे माजी सभापती श्री रवींद्रसिंह राऊळ, माजी जि.प. सदस्य श्री वीरेंद्रसिंह गिरासे , शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती श्री दरबारसिंह गिरासे, दोंडाईचा नगरपरिषदेचे नगरसेवक श्री जितेंद्रसिंह गिरासे , कृउबा चे माजी सचिव व पत्रकार श्री जे पी गिरासे , जिल्हा काँग्रेसचे महासचिव डॉ दरबारसिंह गिरासे , सौ शुभदा गिरासे , ईण्डेन गॅस एजन्सीचे श्री शैलेश गिरासे, महाराणा प्रतापसिंह स्मारक अभियानचे प्रदेशाध्यक्ष श्री सचिन राजपूत, सुरत येथील पत्रकार श्री रावसाहेब राजपूत, रत्नदीप फाउंडेशनचे श्री भरत गिरासे, करणी सेनेचे श्री विरपाल राजपूत, श्री योगेश राजपूत , पत्रकार अमोल राजपूत , रिल्सस्टार भूषण राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. महाआरती ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नाना सिसोदे यांनी केले तर श्री अशोक गिरासे यांनी आभार मानलेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री महाराणा प्रतापसिंह मित्र मंडळ व राजपूत बॉईज ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतलेत.
