शहादा पोलीस ठाण्यातर्फे जनता दरबाराचे यशस्वी आयोजन, एकाच
दिवसात तब्बल 145 तक्रारींचे निवारण..
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सामान्य नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्यांचे निरसन करण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या मनातील पोलीसांविषयी भिती दूर होऊन पोलीस व जनता संबंध वृध्दींगत व्हावे यासाठी दिनांक 15/09/2023 रोजी शहादा पोलीस ठाण्याच्या आवारात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सदर जनता दरबाराचे उद्घाटन जनता दरबारसाठी उपस्थित असलेल्या वयोवृध्द् महिलांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्ष श्री. राजन मोरे, महिला सहायता कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे यांचेसह शहादा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच शहादा तालुक्यातील सुमारे 350 ते 400 नागरिक उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, "पोलीस हा जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण करणारा घटक समजला जातो. लहान पणापासूनच त्याच्या मनात पोलीसांविषयी भिती निर्माण केली जाते. त्यामुळे अशा नागरिकांच्या मनामध्ये पोलीसांविषयी नकारात्मक भावना निर्माण होवून भविष्यात असे नागरिक पोलीस ठाण्याला येवून आपली तक्रार करण्याचे टाळतात किंवा त्यांचे धाडस करत नाही, म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दलानेच जनतेपर्यंत पोहोचण्याचे जनता दरबारामार्फत ठरविले. पोलीस हा देखील समाजाचाच एक भाग असून तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जावून काम करीत असतो. पोलीस विभागाचे कामकाज अतिशय व्यस्त असते कधी कायदा व सुव्यवस्था तर कधी गुन्हे तपास तसेच दैनंदिन कामकाज त्यातच एखादा सामान्य नागरिक त्याची तक्रार किंवा समस्या घेऊन पोलीस ठाण्याला आला तर व्यस्त कामकाजामुळे पोलीसांकडून त्याची समस्या किंवा तक्रारीचे समाधान होण्यास विलंब होत होता. पोलीस विभागाकडून सामान्य नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्यांचे समाधान करण्यासाठी तसेच त्याला न्याय देण्यासाठी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तक्रारदारांचे समाधान करण्यासाठी व सर्व सामान्य नागरिकांना सर्व एकाच ठिकाणी मदत उपलब्ध व्हावी हा असून नागरिकांचा वेळ वाया जावू नये हा आजचा पोलीस व जनता दरबार घेण्यामागील मुख्य उद्देश होता. तसेच नागरिकांनी कोणाच्याही दबावाखाली न येता तक्रार देण्याचे टाळू नये. नागरिकांच्या काही तक्रारी किंवा समस्या असतील तर त्यांनी कसलीही भिती न बाळगता पुढे येऊन तक्रार करावी" असे यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमला उपस्थित अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना नमुद केले की, किरकोळ वादाचे रुपांतर मोठ्या वादात होत असतात आणि मग त्यानंतर पोलीसांना त्यात हस्तक्षेप करावा लागत असतो. त्याचा परिणाम संपूर्ण गावावर होत असतो. तसेच किरकोळ वाद गाव पातळीवरच मिटले. तर त्याचे रुपांतर मोठ्या वादामध्ये होत नाही. त्याचप्रमाणे कौटुंबिक वाद देखील आपसात समझोता मिटविले जावू शकतात, परंतु काही वेळेस समझोता न झाल्यामुळे पोलीस ठाण आणि नंतर मा. न्यायाल कारवाईला सामोरे जावे लागते यात नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होतात. नागरिकांनी जास्तीत जास्त किरकोळ वाद हे आपसात समझोता केल्याने गावात शांतता राहिल" असे सांगितले.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी जनता दरबारसाठी उपस्थित असलेल्या सर्व सामान्य जनतेच्या समस्या / तक्रारी ऐकुन स्वतः त्यांचे निराकरण करुन जनता दरबाराची सुरुवात केलेली आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या जनता दरबारासाठी शहादा तालुका व परिसरातील सुमारे 350 ते 400 पुरुष व स्त्रीया उपस्थित होते. सामान्य नागरिकांच्या समस्या / तक्रारी स्वत: नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी ऐकुन त्यावर तातडीने निर्णय घेऊन तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन केले. नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नागरिकांच्या समस्या ऐकुन त्यावर तातडीने निर्णय घेऊन "जनता दरबार" या अभिनव उपक्रमाची सुरुवात मागील वर्षी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथून केली होती.
पती पत्नीच्या भांडणातून वाद झालेल्या दाम्पत्यांचा जनता दरबारामध्ये समझोता घडवून आणण्यातआला व दहा दाम्पत्यांचे मनोमिलन करण्यात यश मिळविले. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी दहा दाम्पत्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या दाम्पत्यांनी
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचेसह नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले.
गर्चे ता. शहादा येथील श्री. राजेश खंड सोनवणे व श्री. विशाल रमेश सोनवणे यांचा शेतजमीनीचा जुना वाद देखील जनता दरबारमध्ये मिटविण्यात आला. तसेच श्रीमती मिनाबाई संतोष मातंग व त्यांचा मुलगा श्री. उमेश संतोष मातंग दोन्ही रा. सालदार नगर, शहादा यांच्यातील 06 वर्षे जुना कौटुंबिक वाद समझोता करुन जनता दरबारामध्ये सोडविण्यात आला.
सदर जनता दरबारमध्ये कौटुंबीक वादा, शेत जमीनीविषयी, दिवाणी वाद, किरकोळ भांडण व मारामारी, महिला संबंधी असे एकुण 145 तक्रारी मांडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 140 तक्रारदारांच्या तक्रारींचे जनता दरबारामध्ये निरसन करण्यात पोलीसांना यश आले असून 5 प्रकरणात मा. न्यायालयात दाद मागणे बाबत समज देण्यात आली आहे. यातील बहुतांशी तक्रारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्वतः हाताळून तक्रारदार व अर्जदार यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या तक्रारींचे निरसन केले.
सदर जनता दरबारसाठी शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार, स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत
यांनी विविध पथके तयार करुन ही सर्व प्रकरणे हाताळण्यास मदत केली. उपस्थित नागरिकांनी या कार्याक्रमाचे मोठया प्रमाणात स्वागत केले व त्यांच्या तक्रारींचे निरसन झाल्याने त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाची प्रास्तावीक व सुत्रसंचालन श्री. जोंधळे सर यांनी केले. तसेच भविष्यातही अशा प्रकारचे जनता दरबार नंदुरबार जिल्ह्यातील इतर पोलीस ठाणे हद्दीत लवकरच भरविण्यात येतील असे यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.
