आदिवासी विकास मंत्री गवितांचा शिरपूर दौरा वादात? ते वक्तव्य भोवणार?
शिरपूर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे मत्स्य साहित्य वितरणाच्या कार्यक्रमासाठी शिरपूर शहरात आले होते. आयोजकांनी त्यांच्या स्वागताची जयत अशी तयारी केली होती. त्यासाठी शहरभरात स्वागताचे बॅनर देखील लावण्यात आले होते. मात्र गावित यांच्या या दौऱ्याची राज्यभरात चर्चा सुरू असून हा शिरपूर दौरा त्यांच्यासाठी वादाच्या ठरत आहे. यामागील प्रमुख कारण असे की या कार्यक्रमादरम्यान मासे खाणे व महिलांचे सौंदर्य याबाबत त्यांनी केलेले वक्तव्य यावर राज्यभरात चर्चा होत असून विरोधकांनी या वक्तव्यावर कडाडून टीका केली आहे. इतकेच नव्हे तर या वक्तव्याची दखल थेट महिला आयोगाने घेतली असून याबाबत खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली असून तीन दिवसात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र डॉ.गावित स्वतः डॉक्टर असल्याने या बाबत ते नेमका काय खुलासा करतात या कडे देखील महाराष्ट्रातील लक्ष लागून आहे.
गवितांचे काय आहे ते वक्तव्य...
आपल्या आहारातील सर्वाधिक पोषक अन्न म्हणून माशांची ख्याती आहे. माशांचे मानवी शरीरासाठी असणारे अगणित फायदे आपल्याला सांगितले जातात, पण माशांमुळे डोळे आणि त्वचा सुंदर होते असं वक्तव्य केलंय महाराष्ट्र सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित यांनी केलंय.
शिरपूर येथील कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांना माशांच्या सेवनाचे फायदे सांगताना विजयकुमार गावित म्हणाले, "तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झालेत."
ते पुढे म्हणाले, "मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात, डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचं तेल असतं. त्या तेलामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली दिसते."
अर्थात "मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात, डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार," आणि त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पेटला मात्र राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून विविध स्तरावर विरोधकांनी त्यावर टीका केली आहे. याबाबत गावित यांचे अद्याप स्पष्टीकरण मिळालेले नाही.
तालुक्यात गावितांचे स्वागत काळे झेंडे दाखवून
शिरपूर शहरात आगमन झाल्यानंतर आदिवासी टोकरे कोळी समाजाने आदिवासी विकास मंत्री डॉ. गावितांना शहरातील करवंद नाक्यावर दाखवले काळे झेंडे दाखवून स्वागत केले आहे.
या प्रकरणात काही तरुणांना अटक करण्यात येऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे.
आदिवासी बांधवांवरील मणिपूरच्या दुर्दैवी अत्याचार आणि तालुक्यातील आदिवासी क्रांतिकारकांचा फलक फाडल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सदरच्या निषेध नोंदवण्यात आला आहे. शिवाय शिरपूर सांगवी येथील दंगलीमध्ये निर्दोष युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी देखील मागणी आदिवासी युवकांकडून होत आहे.
त्यामुळे स्थानिक आमदार खासदार, मंत्री यांच्यावरील आदिवासी समाजाची नाराजी वारंवार उफाडून येत असून या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी भविष्यात हा विषय राजकीय चिंचेच्या विषय असू शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.
एकंदरीत धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, यांनी शिरपूर शहरातील एका कार्यक्रमाला लावलेली हजेरी व त्यातून होणारे वाद व निषेध पाहता हा दौरा वादात अडकला असेच काही चित्र दिसत आहे.
