विरेगाव प्रतिनिधी : राज्यातील सर्व गटाई कामगारांना लॉकडाऊन काळात शासनाने प्रत्येकी दहा हजार रुपये आर्थिक मदत करावी या मागणीसाठी सोमवार दि. १० मे २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राज्यात विविध ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दोन वेळा निवेदन पाठविण्यात आले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन काळ सतत वाढत चालला आहे, या काळात हातावर पोट असलेल्या चर्मकार समाजाच्या गटाई कामगारांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे, म्हणून राज्यातील सर्व गटाई कामगारांना दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या मागणीकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी १० मे रोजी सकाळी अकरा वाजता शासनाचे कोरोनाविषयक सर्व नियम पाळून हे लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. यात समता परिषदेचे सर्व कार्यकर्ते आणि गटाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधून घेतील.
गटाई कामगारांना दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे, संत रविदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळास एक हजार कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात यावे आणि कर्जासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात इत्यादी मागण्यांचा फलक (बोर्ड) लावून हे लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे
Tags
news