धुळे - देशात आणि राज्यात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'लॉकडाउन' करण्यात आले असून, सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना आखल्या जात आहेत. 'लॉकडाउन'मुळे दिव्यांग, गरजू, गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अडचणीच्या काळात धुळे शहरातील 1000 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अशा गरजू लोकांची मदत करणे, हीच आमची समाजसेवा असल्याचे मत यशवर्धन कदमबांडे यांनी व्यक्त केले.
या मदतीतील पहिल्या टप्प्याचे मिल परिसरातील दिव्यांग, गरजू, गरीब कुटुंबांना समांतर अंतर ठेवून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन युवा नगरसेवक अमोल मासुळे यांनी केले होते, यावेळी खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे, श्रमराज्यचे संपादक अतुल पाटील, प्रदीप पानपाटील, संदीप बैसाणे, राजन सुपनार, विक्की थोरात, राज सरग, मनोज सरग आदी उपस्थित होते.
सध्या लॉकडाऊन मुळे मोलमजुरी व छोटे व्यवसाय बंद आहे. हातावरचे पोट असल्याने घरामध्ये बसून अनेक कुटुंबांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. हाताला काम नसल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामाजिक अंतर ठेवून कुठलीही गर्दी न करता गरजूंना मदत करण्यात आली. साधारण १५ दिवस पुरेल इतका किराणा साहित्य या किटमध्ये देण्यात आले आहे. घरातील किराणा माल संपल्याने सगळी कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत होती.अशातच यशवर्धन यांनी केलेली मदत लाख मोलाची ठरत आहे. त्यांनी केलेल्या मदतीने सर्व्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
Tags
news
