प्रतिनिधी, शिरपूर
अहमदनगर जिल्ह्यामधील राहता तालुक्यातील रस्तापूर गावातील बेघर झालेल्या 82 आदिवासी कुटुंबांना घरकूल व उपजिवीकेसाठी प्रति कुटुंब 3 एकर जमीन देण्याची मागणी येथील बिरसा क्रांती दलाने मुख्यमंत्री,महसुलमंत्री, आदिवासी मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सदर घटनेबाबत संघटनेने संताप व्यक्त केला असून पिडीत कुटुंबांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
नगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील गृप ग्रामपंचायत पुणतांबा - रस्तापूर अंतर्गत असलेल्या रस्तापूर येथे आदिवासी भील्ल जमातिची 82 कुटुंबे गेल्या 30 वर्षांपासून सरकारी जागेवर झोपड्या बांधून राहत होते. आणि सरकारच्याच ताब्यातील जवळपास 250 एकर जमिनीवर चरितार्थ चालवत होते. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना न देता मोठ्या पोलिस बंदोबस्तात आदिवासी कुटुंबांना हाकलून लावले. कारवाई दरम्यान अन्नधान्याची नासाडी केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाच्या तुघलकी निर्णयाचे बळी पडलेल्या आदिवासी भील्ल कुटुंबांना घरकूल आणि उदरनिर्वाहासाठी प्रति कुटुंब 3 एकर जमीन देण्याची मागणी बिरसा क्रांती दलाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष मनोज पावरा,धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, महासचिव विलास पावरा, तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, कार्याध्यक्ष साहेबराव पावरा, सचिव गेंद्या पावरा, समाधान ठाकरे, मधुकर मालचे, मद्रास पावरा, काकड्या पावरा, भीमराव पावरा यांनी मुख्यमंत्री, महसुलमंत्री, आदिवासी विकासमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अचानक केलेल्या कारवाईमुळे बेघर झालेल्या कुटुंबांना सरकारने घरकूल आणि प्रतिकुटुंब 3 एकर जमीन देवून जगण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे .
Tags
news
