धुळे दि.15 - राज्यात 14000 ग्रामपंचायतींच्या नुकत्याच निवडणुका झाल्यात त्यात नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामविकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे,
राष्ट्रीय ग्राम विकास अभियान अंतर्गत यशदा प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान दरम्यान आदर्श गाव हिवरे बाजार जि. नगर येथे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न झाले. ग्रामपंचायत विकासाचा केंद्रबिंदू असून प्रशिक्षक म्हणून ग्रामविकासात प्रशिक्षकांची देखील महत्त्वाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी प्रशिक्षण समारोपप्रसंगी केले. तीन दिवस आयोजित प्रशिक्षणासाठी राज्यातील विस्तार प्रशिक्षण केंद्र हिवरेबाजार सह खामगाव (बुलढाणा), खिरोदा (जळगाव), वर्ये (सातारा), गारगोटी (कोल्हापूर), कोसबाड (पालघर), इ. 6 पंचायत राज प्रशिक्षण केंद्रातील 15 जिल्ह्यातील 32 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक महेंद्र पांगळ, विजय जाधव, राहुल गुरव, अमीर शेख, श्री आव्हाड सर, प्रदीप चौधरी आदींनी प्रशिक्षण पद्धती, कौशल्य, ग्रामपंचायत अधिनियम, ग्राम विकास आराखडा प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायतीच्या सभा, लेखा संहिता, ई-पंचायत, गटकार्य सादरीकरण, ग्रामविकासाच्या योजना इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले.
यशदा प्रशिक्षण संस्थेच्या सहाय्यक प्राध्यापक प्रांजल शिंदे यांनी तीनदिवसीय प्रशिक्षणाचे उत्तम रित्या नियोजन केले व प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. हिवरे बाजार विस्तार प्रशिक्षण केंद्रातील समन्वयक हबीब सय्यद यांनी योग्य नियोजन करून महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशिक्षक उमाकांत पाटील, धनाजी पाटील, कल्पना पाटील, प्रसन्नता चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले. समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
Tags
news
