मुंबई - महाराष्ट्रात पत्रकारांना दडपशाहीची वागणूक दिली त्यात असल्याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अवगत केले आहे. सदरचे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमाने व्हायरल झाले आहे. या पत्रामध्ये फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे की राज्यात काही दिवसापासून पत्रकारांना काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे यापूर्वी एबीपी माझा चे पत्रकार राहुल कुलकर्णी, टाईम्स नाऊ चे वरिष्ठ संपादक आणि रिपब्लिक टीव्ही च्या बाबतीत झालेल्या प्रकाराकडे आधीच आपले लक्ष वेधले होते, आता हा प्रकार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून समोर आला असून टीव्ही 9 मराठी चे पत्रकार श्री राहुल झोरी यांच्याबाबत घडला आहे. राहुल झोरी महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची राज्यभर फिरून वार्तांकन करीत आहेत, मजूर शेतकरी नागरिकांच्या प्रश्नांच्या मागावा घेत आहेत, धुळ्याच्या प्रवासात असताना स्थलांतरित मजुरांसाठी शासनाचे रिलीफ कॅम्प हे केवळ कागदोपत्री असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी उत्तम काम करून बातमी दिली सदरच्या बातम्यांमध्ये स्थानिक गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी नोंदवले आहेत बाजू ऐकून घेण्यासाठी स्थानिक तहसीलदारांची बाजू सुद्धा त्यांनी आपल्या बातमी दाखवली आहे मात्र हे सर्व झाल्यानंतर संबंधित पत्रकार विरोधात तहसीलदार शिरपूर यांनी शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. सदर पत्रकाराने आपल्या बातमी संदर्भात सर्व पुरावे स्थानिक पोलिसांना दिले आहेत. आणि म्हणून फडणवीस यांनी म्हटले आहे की अशा पद्धतीने पत्रकारांचे शोषण त्यांची दडपशाही आणि वास्तविक चित्र जनतेसमोर येऊच नये अशा पद्धतीचे धोरण अंगी करू नये शिवाय सदरचा गुन्हा देखील तात्काळ मागे घ्यावा यासाठी विनंती करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर तहसीलदार आबा महाजन यांनी टीव्ही 9 मराठी चे पत्रकार राहुल झोरी यांनी बातमीची सत्यता न पडताळता बदनामीकारक वृत्त प्रसारित करून कर्तव्यात कसूर केला आहे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाची दखल विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतल्यानंतर सदर प्रकरणाची रीतसर चौकशी होण्याची शक्यता असून या पत्रकारांनी कोणत्या साक्षीपुरावे आणि माहितीच्या आधारे वार्तांकन केले याची देखील चौकशी होऊन सदर प्रकारातील नेमके अंतिम सत्य काय हे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात कोणाच्या अडचणीत वाढ होईल ते लवकरच समोर येईल.
